आजचा हवामान अंदाज या आठवड्यात महाराष्ट्रावर १००० ते १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्याची शक्यता असून, हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शकता आहे. त्यामुळे मॉन्सून वाऱ्यांना योग्य गती व दिशा मिळणार आहे. या आठवड्यात कोकणात अतिवृष्टी तर उर्वरित महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होणार आहे.
अपेक्षित पावसामुळे सोयाबीन (Soybean), मूग (Green Gram), उडीद मटकी, चवळी, तूर, भुईमूग (Groundnut) या द्विदलवर्गीय पिकांच्या पेरण्या (Sowing) राहिलेल्या पूर्ण करता येतील. हा पाऊस फळबागांच्या लागवडीसाठी तसेच उभ्या फळबागांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे आणि कोकणात भात लावणीसाठी चिखलणीची कामे पूर्ण करून भात रोपांची लावणी पूर्ण करून घावी. दुष्काळी पट्ट्यात पेरणीयोग्य पाऊस होताच पिकांच्या पेरण्या करून घेतल्या पाहिजे.
कोकण ः
ठाणे व पालघर जिल्ह्यात आज ७६ मिमी, तर उद्या ६० मिमी पावसाची शक्यता वर्तविली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, व रायगड जिल्ह्यांत आज ५४ ते ६० मिमी आणि उद्या ५५ ते ६४ मिमी. पावसाची शक्यता निर्माण आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १८ कि.मी. राहील. आणि तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २२ ते २८ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस असे असेल.
उत्तर महाराष्ट्र ः
नाशिक व धुळे जिल्ह्यांत आज ७५ मिमी, तर उद्या २० ते ४५ मिमी पावसाची शक्यता वर्तविली आहे. आज नंदूरबार जिल्ह्यात ५२ मिमी, तर जळगाव जिल्ह्यात ३२ मिमी पावसाची शक्यता असून उद्या १२ ते १७ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १४ ते २३ किमी राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांत २८-२९ अंश सेल्सिअस व जळगाव जिल्ह्यांत २६-२७ अंश सेल्सिअस राहील. सर्व जिल्ह्यांत किमान तापमान २३-२४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ९२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ८६ टक्के राहील.
मराठवाडा ः
उस्मानाबाद, लातूर, व जालना जिल्ह्यांत आज ६ ते ८ मिमी, तर उद्या ६ ते १२ मिमी पावसाची शक्यता आहे. नांदेड, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २४ तर उद्या १३ ते १६ मिमी पावसाची शक्यता आहे आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांत २४-२५ किमी राहील. नांदेड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १८ ते २० किमी राहील. कमाल तापमान औरंगाबाद, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत २९ ते ३१ अंश सेल्सिअस, तर नांदेड जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, परभणी व जालना जिल्ह्यांत २६-२७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ८७ टक्के, तर दुपारची ७४ ते ८० टक्के राहील. पावसाचे प्रमाण सर्वच जिल्ह्यांत मध्यम राहनार आहे.
पश्चिम विदर्भ ः
कमाल तापमान बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २५ ते २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ वातावरण राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील आणि या सर्वच जिल्ह्यांत आज २६ ते ३० मिमी. पावसाची शक्यता वर्तविली आहे. उद्या अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३७ ते ४१ मिमी. तर वाशीम, बुलडाणा जिल्ह्यांत १७ ते २५ मि.मी. पावसाची शक्यता आहे.
मध्य विदर्भ ः
आज यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात १३ ते १५ मिमी व नागपूर जिल्ह्यात २७ मिमी पावसाची शक्यता आहे आणि या सर्वच जिल्ह्यात उद्या ६ ते १३ मिमी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहणार आहे. वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १७ किमी राहील आणि आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ७३ टक्के राहील.
पूर्व विदर्भ ः
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत आज १४ ते १९ मिमी तर उद्या ७ ते १४ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ७ ते १३ कि.मी. राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
दक्षिण पश्चिम महाराष्ट्र ः
कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत आज ४१ ते ४५ मिमी पावसाची शक्यता वर्तविली आहे. सोलापूर जिल्ह्यात आज आणि उद्या ८ मि.मी. पावसाची शक्यता असून पुणे जिल्ह्यात आज ५०-५५ मि.मी. आणि उद्या ३४-३६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात आज ३८-४० मि.मी. व उद्या २३-२५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहनार आहे.
कृषी सल्ला ः
१) भात लावणीसाठी चिखलणीची कामे करून २५ ते २८ दिवसांची भात रोपे लावावीत.
२) चांगला पाऊस झालेल्या ठिकाणी सोयाबीन पिकाची रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी करून घावी.
३) दुष्काळी पट्ट्यात पाऊस चांगला झालेल्या ठिकाणी बाजरी अधिक तूर (२ः१) या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्यात यावा.
४) जमिनीत चांगली ओल झाल्यानंतर मूग, मटकी, उडीद, चवळी, तूर या पिकांच्या पेरण्या करून घाव्यात.